भंडारा : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहराजवळील बेला गावात रविवारी (27 एप्रिल) रात्री 10:30 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. रायपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या बोलोरो गाडीला नागपूरकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, ज्यामुळे बोलोरोतील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला.
मृतांची नावे शिलेंद्र बघेले, शैलेश गोकुळपुरे, विनोद बिनेवार आणि अशोक धैरवाल अशी असून, जखमी चालक अविनाश नक्तोडे यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलोरोतील पाच प्रवासी बेला येथील हॉटेल साई प्रसाद येथे जेवणासाठी वळत असताना हा अपघात झाला. धडकेमुळे बोलोरोचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, परंतु पोलिसांनी वाहने हटवून वाहतूक पूर्ववत केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कटाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, व्यस्त महामार्गांवर वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.