पुणे – बहुप्रतिक्षित भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतून आजपासून पूर्व भागाला पाणी पुरवठा सुरू होणार आहे. पहिल्या टप्यात धानोरी आणि लोहगाव परिसराला पाणी मिळणार असून त्यामुळे आता लोहगावकारांना आठ दिवसांऐवजी तीन दिवसांनी पाणी मिळणार आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.
नववर्षाच्या सुरवतीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन झाले. या योजनेतून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या वितरणाबाबत वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला.
या बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता नंदकिशोर जगताप, मनिषा शेकटकर, सुदेश कडू, विनोद क्षीरसागर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शनिवारपासून भामा आसखेडचे प्रत्यक्षात नागरिकांना मिळण्यास सुरवात होणार आहे.
तीन टप्यात या पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात आजपासून संपूर्ण धानोरी आणि लोहगाव भागाला पाणी मिळणार आहे. सद्यस्थितीला लोहगाव भागात सर्वाधिक पाणी टंचाई असून आता आठ दिवसांनी पाणी मिळत आहे. मात्र, भामा आसखेडमधून पाणी मिळणार असल्याने हा कालावधी तीन ते चार दिवसांवर येईल असा विश्वास आमदार टिंगरे यांनी व्यक्त केला.
तर या योजनेतून दुसऱ्या टप्यात म्हणजे साधारण महिनाभराने वडगाव शेरी आणि विमाननगर परिसराला पाणी मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्यात फुलेनगर, प्रतिकनगर, नागपूर चाळ, हाऊसिंग बोर्ड या भागाला पाणी पोहचेल आणि शेवटच्या येरवडा, टिंगरेनगर, कळस यासह उर्वरित भागाला पाणी मिळणार आहे.
“भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतून आज प्रत्यक्षात पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेसाठी केलेल्या पाठपुराव्यातून मतदारसंघातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार असल्याने अत्यंत समाधानी आहे. सर्व मतदारसंघाला लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच राहील.” – सुनिल टिंगरे (आमदार, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ)