शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा कल पाहता जिल्हाधिकारी नवलकिशोर यांचा निर्णय
राजगुरनगर(प्रतिनिधी) : भामा आसखेड धरण पुनवर्सन मागण्यांवर ठाम असलेल्या शेतकरी आणि धरणाच्या पाण्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन यांचा कल पाहून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुण्याच्या जलवाहिनीचे काम पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी आंदोलन कर्त्यांना व पत्रकारांना दिली.
दरम्यान, भामा आसखेड धरणग्रस्तांनी गेले तीन दिवस सुरु ठेवलेल्या जलसमाधी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यानी मंगळवारी (दि९) राजगुरुनगर येथे बोलावलेल्या बैठकीत दोन तास चर्चा होऊन काहीच निष्पन्न झाले नाही. समाधान न झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करीत सभागृह सोडले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1236932579979778/
भामा आसखेड धरणावरून पुण्याला जलवाहिनी नेण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पाला सुरुवातीला तीव्र विरोध आहे. धरणग्रस्तांच्या प्रलंबित ११ मागण्या पूर्ण झाल्यावर यातील एक किलोमीटर अंतराचे पाईप लाईनचे काम करणार असे ६ जानेवारी २०१६ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी २३ गावातील आंदोलकांना लेखी दिले होते. असे असताना पुनर्वसन प्रश्न प्रलंबित ठेऊन पाईप लाईनचे काम पोलिसबळ वापरून युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. या मुद्यावरून धरण ग्रस्त आक्रमक झाले. २३ गावातील नागरिक, महिला, मुलांसह धरणाच्या पाण्यात उतरून अतिशय धोकादायक पद्धतीने आंदोलन करीत आहेत.
आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मंगळवारी (दि९) खेड पंचायात समितीच्या सभागृहात धरणग्रस्त आणि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, विभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील व अधिकारी बैठकीला उपस्थित होते.आंदोलकांच्या बाजूने जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, आंदोलनाचे प्रतिनिधी सत्यवान नवले, देवीदास बांदल, गजानना कुडेकर, गणेश जाधव, शांताराम शिवेकर, स्वप्नील येवले,तुकाराम नवले, किसान नवले हे शेतकरी उपस्थित होते.
यावेळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बैठकीत आंदोलक पहिल्या पासून पूर्वी दिलेले लेखी आश्वासन प्रशासनाने पाळावे, ११ मागण्या पूर्ण कराव्यात आणि पुण्याच्या पाईप लाईनचे काम करावे यावर ठाम राहिले. तर हे काम पूर्ण झाले तरी धरणग्रस्त वा-यावर सोडले जाणार नाहीत. जमीन उपलब्ध झाल्यास जमीन दिली जाईल. आर्थिक पकेजबाबतही विचार केला जाईल. प्रलंबित बुडीत बंधारे, पुनर्वसनातील उर्वरीत कारवाई पूर्ण केली जाईल असे जिल्हाधिकारी राम यांनी वारंवार सांगितले. परंतु धरणग्रस्त आपल्या मागणीवर ठाम राहिले. तोडगा निघत नसल्याचे पाहून त्यांनी बैठक संपवली. तर धरणग्रस्तानी सभागृहां बाहेर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. अखेर धरणग्रस्तांच्या मागणीवर नव्याने प्रस्ताव तयार करून पुन्हा संयुक्त बैठक होई पर्यंत पाईप लाईनचे काम थांबवण्याची घोषणा नवलकिशोर राम यांनी केली.
या बैठकीनंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, प्रांत अधिकारी संजय तेली, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, विभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्यात चर्चा झाल्यानंतर पुढील काही दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलनाचे प्रमुख सत्यवान नवले यांनी सांगितले कि, १०० टक्के मागण्या पूर्ण झाल्याशिवाय पुण्याच्या जलवाहिनीचे काम केले जाणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र सरकारने पोलीस बळ वापरून काम सुरु केले. यासाठी अनेकदा आंदोलने केली मात्र सरकार निर्णय घेत नव्हते अखेर शेतकरी आक्रमक होऊन धरणाच्या पाण्यात उतरून आंदोलनाची भूमिका घेतली. त्याबाबत दखल घेत आज जिल्हाधिकाऱयांनी बैठक बोलावली. त्यात आमच्या मागण्या समाधानकारक मान्य न केल्याने आम्ही बैठकीतून बाहेर पडलो. शासनाने एक किमी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जलसमाधीचे आंदोलन स्थगित केले असून मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढे तीव्र अंदोलन केले जाईल.