प्रकल्प व्यवस्थापक चिनीवार : विरोधामुळे “डेडालाईन’ हुकणार?
शिंदे वासुली- भामाआसखेड धरणातून पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या जॅकवेलचे काम अंतिम टप्प्यात आले असून फक्त फिनीशिंगची कामे सुरू असल्याचे आयटीडीचे प्रकल्प व्यवस्थापक प्रसन्न चिनीवार यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेने जॅकवेल, जलवाहिनी आदि कामे डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे; परंतु भामाआसखेड धरणग्रस्तांचा विरोध पाहता हा मुहूर्त हुकणार असल्याचे दिसते. जॅकवेलचे काम जरी अंतिम टप्प्यात असले तरी धरण तुडूंब भरल्याने पाण्याखाली फिनीशिंगची कामे करण्यास अडचणी येत आहेत. जेव्हा धरणाची पाणी पातळी कमी होईल तेव्हाच कामे करता येईल, अशी परिस्थिती आहे. याशिवाय पॉवरहाऊस, रस्ता, आसखेड हद्दीतील 1 किमी अंतराची पाइपलाइन अशी अनेक कामे होणे बाकी आहे. आणि प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या एजन्सीज काम करतात. आयटीडी कंपनी फक्त जॅकवेलचे काम करावयास मर्यादित आहे, असे प्रसन्न चिनीवार यांनी सांगितले. सध्या पंपहाऊस व इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे. पंप फिटींग, पाण्याखालून भुयारी मार्गाने जॅकवेलचे पाईपींग संदर्भातील महत्त्वाची कामे उरकली आहेत. इमारतींची फ्लोरींग, रंगरंगोटी सारखी बांधकाम संबंधित कामेही पुर्णत्वास आली आहेत. आणि पाणी पातळी कमी झाल्यावर जॅकवेलच्या कामावर शेवटचा हात फिरवतात आहेत. परंतु काम पूर्ण होण्यात आणि पुणे महानगरपालिकेला वेळेत पाणी मिळण्यात भामाआसखेड प्रकल्ग्रपस्त व जिल्हा प्रशासन यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
- जॅकवेलचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी पर्यायी जमीन न मिळालेले भामा आसखेड प्रकल्ग्रपस्त पुनर्वसनाच्या अन्य मागण्या घेऊन पुन्हा मैदानात उतरणार आहे.
– सत्यवान नवले, धरणग्रस्त शेतकरी - या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
विधानसभेची आचारसंहिता असली तरी, निवडणुकीपेक्षा आमचा जीवन मरणाचा प्रश्न सुटण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला विरोधच करणार. प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही. याशिवाय तालुक्याच्या कोणत्याही नेत्याने आपली बाजू खंबीरपणे मांडली नाही. त्यामुळे कुणाच्याही भुल थापांना बळी पडू नये, असे आवाहन करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजना निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास नक्कीच अडचण येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.