पुणे – भगव्या टोप्या, भगवे झेंडे, “जय श्रीराम’, “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि “छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत रविवारी पुण्यात हिंदू संघटनांनी एकत्र येऊन “हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढला. यात आबाल, वृद्ध, महिला, विविध संघटना, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणजे फाल्गुन अमावस्या हा दिवस “धर्मवीर दिन’ म्हणून जाहीर करावा, तसेच “लव्ह जिहाद’, धर्मांतर आणि गोहत्या यांच्या विरोधात कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चात छत्रपती घराण्याचे वंशज आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, संत श्री तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, धनंजय देसाई आणि तेलंगणाचे आमदार राजा सिंह ठाकूर उर्फ राजा भैया यांची मोर्चात प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शहरातून भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप शहर सरचिटणीस राजेश पांडे, धीरज घाटे, गणेश बिडकर, दीपक नागपुरे, मिलिंद एकबोटे, “हिंदू एकता आंदोलन’चे विक्रम पावसकर, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांच्यासह शहरातील विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती येथे आरती केल्यानंतर हा मोर्चा लक्ष्मी रस्ता मार्गे डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आला, तेथे सभेची सांगता झाली.
छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले..
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण होत आहे, वेगळ्या भूमिका मांडल्या जातात हे दुर्दैव आहे. बेताल वक्तव्ये करून नाव चर्चेत राहिले पाहिजे अशी वृत्ती काहीजणांची असते. आज या मोर्चाच्या रूपाने मला हे भगवे वादळ दिसत आहे. हिंदू धर्माचे रक्षण झाले पाहिजे हीच आपली सर्वांची भावना असून देव, देश आणि धर्माच्या रक्षणात तडजोड होऊ शकत नाही. एकत्र आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आम्ही कोणाचाही द्वेष करायला एकत्र आलो नाहीत. म्हणूनच आम्ही कोणाच्याही विरोधात घोषणा दिल्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतीस्थळ हे “तीर्थस्थळ’ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील मावळ्यांमध्ये जेवढे हिंदुत्व दिसते तेवढे अन्यत्र दिसत नाही. धर्मांतराच्या विरोधात लढणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. देशात “लव्ह जिहाद’चे पसरत आहे. या विरोधात कायदा झाला पाहिजे. आम्हाला कोणाशीही संघर्ष करायचा नाही. आम्ही गोहत्या होऊ देणार नाही. ज्या पुण्येश्वर मंदिरावरून पुण्याचे नाव पडले ते मंदिर अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा. ते मुक्त झाल्यावर तेथे आरती झाली तर मी सर्वांत आधी येईन.
– राजासिंह ठाकूर, आमदार, तेलंगणा