मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. विरोधी पक्षासह भाजपमधील काही नेत्यांनी राज्यपालांच्या उचलबांगडीची मागणी केली आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी तर मी हतबल झालो अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.
पण केंद्रीय नेतृत्व गुजरातच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने आठ डिसेंबरनंतरच राज्यपालांबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यानंतरही कारवाईचा “क’ ही उच्चारला जात नसल्याने उदयनराजेंनी शिवसन्मान कार्यक्रम हाती घेतला आहे. ते समर्थकांसह रायगडाकडे निघालेत. उद्या ते आपली वेदना रायगडावर व्यक्त करणार आहेत. राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आंदोलने केली. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणातून राज्यपालांवर टीकास्त्र सोडले होते. भाजप नेत्यांनी समर्थनाचा प्रयत्न केला, पण लोकभावना लक्षात घेऊन त्यांनीही यू टर्न घेतला. आता छत्रपतींचे वंशज आक्रमक भूमिकेत असल्याने विरोधकांना राज्यपालांवरील कारवाईचे श्रेय किती मिळेल याबाबत शंका आहे.