सावधान! हा शब्दबोध आपल्या कानावर अगदी बालपणापासून पडत असतो. पावलोपावली ही सावधानतेची सूचना आपल्याला दिली जाते. बालपणात खाताना, खेळताना, दंगा मस्तीचा निर्मळ आनंद लुटत असतानाही “अरे, सावधानतेने खेळा रे. काळजी घ्या, निष्काळजी राहू नका. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. खाताना घाईगडबड करू नका’ अशा सूचना, इशारे दिले जातात. त्या सर्वांमागचा हेतू एकच असतो, तो म्हणजे आपली सुरक्षा.
त्यानंतर बालपण संपले की मुंज होते. त्यावेळी आपल्या कानावर पुन्हा “शुभ मुहुर्त सावधान…’ हा शब्द पडतो. इथे तो शब्द आपल्याला आपली कर्तव्यबुद्धी जागविण्यासाठी असतो. एकाग्र चित्ताने अभ्यास करा. जिज्ञासूवृत्तीने नाना विषय, कलाकौशल्ये याचे अध्ययन करून कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून तयार व्हा हे सांगण्यासाठी असतो. त्या भावी काळासाठी घडण्यासाठी हाच शुभ काळ आहे, याचे संकेत देत असतो.
त्यानंतर नोकरी, व्यवसाय, छंद यात बस्तान बसविले की घरची मंडळी आपले दोनाचे चार हात करण्याच्या तयारीला लागतात. आपणही त्या मंगल विवाह बंधनात गुंतायला तयार असतो. तिथेही हे मंगल मिलन पती आणि पत्नी यांना किती नव्या जबाबदाऱ्या घेऊन पेलायचे आहे, याची पूर्वसूचना देण्यासाठीच हा “सावधान’ असा इशारा असतो.
संसार प्रपंच्यात तर ही सावधानता आपल्याला अनेक बाबतीत आणि वेळोवेळा बाळगावी लागते. मग ती सावधानता दैनंदिन जमाखर्चाचा ताळमेळ बसवण्याची असेल, नातेसंबंध टिकविण्याची असेल, व्यक्ती व्यक्तीतील सुखसंवाद जपन्याची असेल, नाहीतर अगदी घरातल्या बाळ आणि वृद्ध यांच्या आरोग्याची असेल. प्रत्येक बाबतीत आपल्याला हे असे सदैव सावध राहावेच लागते.
पुढे वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, घरातील ज्येष्ठांच्या आरोग्य समस्या, आर्थिक ओढाताण, तुमचे स्वत:चे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, जीवनातले कडू गोड प्रसंग, या वेळीही हे सावधानतेचे भान राखावेच लागते. इतकेच नाही तर वाढत्या वयाबरोबर जीवनात येणारे एकटेपण, मृत्यूचे भय आणि प्राप्त झालेल्या नर जन्माची आपण खऱ्या अर्थाने सार्थकता केली नाही याची खंत जीवास लागू नये म्हणून काही तरी परमार्थ साधना करावी. नामस्मरणाचे पाठबळ मिळवावे. त्यासाठी नित्योपासना करावी. प्रत्येक दिवशी ही सावधानता राखणे हेच त्या शब्द बोधाचे खरे अनुकरण होय.