मुंबई – ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी लोकांनी व्हिडिओ कॉल्स आणि अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर सेल पोलिसांनी केले आहे. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून अनेकांना धमकाऊन फसवले जाते त्या कॉल्सनाही प्रतिसाद न देण्याचे आवाहन या विभागाने केले आहे.
राज्य सायबर विभागाकडे अशा फसवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. वीज बिलांच्या बहाण्याने, कर्ज ऍप्स आणि ऑनलाइन मार्केटप्लेसद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे, कोणत्याही गोष्टीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी लोकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे, असे या विभागाने म्हटले आहे.
व्हिडीओ कॉलमध्ये महिलांना आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्याची आणि नंतर दिल्ली सायबर पोलिसांचे अधिकारी म्हणून लोकांकडून पैसे उकळल्याची प्रकरणे समोर आली आहेत,असेही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकांनी अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल स्वीकारू नये. जर त्यांना पुन्हा कॉल आला तर त्यांनी तो नंबर ब्लॉक करावा किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.तसेच लोकांनी अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत. अशा बहुतेक प्रकरणांमध्ये, फसवणूक करणारे महिलांची छायाचित्रे वापरतात, लोकांचा विश्वास संपादन करतात आणि नंतर गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात, असे ते म्हणाले.
राज्याच्या सायबर विभागाकडे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या सुमारे 400 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वीज बिलांच्या थकबाकी बद्दल वीज काटण्याची धमकी देऊन ग्राहकांना लुटण्याचे प्रकार अलिकडे वाढीला लागले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. अशा कॉलरशी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी, लोकांनी वीज कंपनीच्या ग्राहक सेवा कक्षाशी संपर्क साधावा, त्यांचे वीज मीटर तपासावे किंवा कंपनीने आपल्या वतीने कॉल करण्यासाठी कोणाला काम दिले आहे का ते विचारावे.
कर्ज ऍप्स द्वारे कर्ज घेण्याचेही लोकांनी टाळले पाहिजे कारण त्यांच्यापैकी अनेक जण खंडणीच्या प्रकरणात गुंतलेले असतात आणि कर्ज प्रकरणांमध्ये लोकांचीही मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली जाते.