माहिती न देण्याचे सर्वच बॅंकांचे ग्राहकांना आवाहन
पुणे – कर्ज घेतलेल्या ग्राहकांना तीन महिने हप्ता लांबणीवर टाकण्याची सवलत रिझर्व बॅंकेने दिली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणारे लोक ग्राहकांकडून त्यांच्या खात्याची माहिती काढून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापासून बॅंक ग्राहकांनी सावध राहावे, असे आवाहन विविध बॅंकांनी केले आहे.
यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया, ऍक्सिस बॅंक, स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेचा समावेश आहे. फसवणूक करणारे विविध ग्राहकांना सोशल मीडिया, ई-मेल, फोन कॉल व एसएमएसच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना आपला ओटीपी, सीव्हीव्ही, पिन, पासवर्ड देऊ नये असे या बॅंकांनी म्हटले आहे.
फसवणूक करणारे लोक विविध माध्यमांचा वापर करून “आम्ही बॅंकेचे कर्मचारी आहोत’ असे ग्राहकांना भासवतात. “आपल्याला ईएमआय न देण्याचा पर्याय स्वीकारायचा असेल तर आपल्या बॅंक खात्यासंदर्भातील माहिती द्यावी,’ असे सांगतात. ही माहिती दिल्यानंतर हे फसवणूक करणारे लोक बॅंक ग्राहकाच्या खात्यातून पैसे लंपास करतात. अशा अनेक तक्रारी रिझर्व बॅंकेकडे आलेल्या आहेत. त्यानंतर रिझर्व बॅंकेने इतर बॅंकांना यासंदर्भात ग्राहकांना सावध राहावे, असे आवाहन करण्याबद्दल सांगितले आहे.
बहुतांश खासगी बॅंकाकडून ग्राहकांना त्यांनी ई-मेल करून किंवा इतर संपर्क वापरून इएमआय पुढे ढकलण्याचा पर्याय मागितल्यानंतरच त्यांना हा पर्याय दिला जातो.