जामखेड – जामखेड तालुक्यात थंडीत वाढ झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीसोबतच पहाटे धुके पडत असल्याने शहर व परिसरातील रस्ते धुक्यात हरवले आहेत. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बाजारपेठेत उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून, ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीची लपाछपी सुरू होती. मात्र शुक्रवारपासून पुन्हा थंडीमध्ये वाढ झाली. गेल्या दोन दिवसांत किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे. त्यामुळे दिवसाही थंडी जाणवत आहे. या बोचऱ्या थंडीमुळे थंडी नकोशी वाटू लागली आहे. रात्री उशिरापर्यंत गजबजणारे रस्ते आता लवकर निर्मनुष्य होताना दिसत आहेत. थंडीच्या कडाक्यामुळे सकाळच्या वेळी शाळा, महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे.
एक-दोन दिवस थंडी पडल्यानंतर पुन्हा आभाळ येत असल्यामुळे विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा कडाका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांसाठी हे वातावरण फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार बोलत असले, तरी धुक्याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गत 5 ते 6 दिवसांपासून वातावरणात परिणामकारक बदल झाला असून, दिवसागणिक वाढत चालेली थंडी, धुके व ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, कपाशी या पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिकांनाही जबर फटका बसत आहे.
थंडी वाढल्याने रात्री व सकाळी रस्ते सुनसान दिसत आहेत. आणखी काही दिवस ही थंडी व धुके राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.