मुंबई – ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सुमारे 45 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. तसेच आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात द्यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपींनी हत्येसाठी 45 लाखांची सुपारी दिली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन हा महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात अटक झालेले आरोपी अत्यंत खतरनाक असल्याचे एनआयएचे वकील सुनील गोन्साल्विस यांनी सांगितले. 4 ते 5 साक्षीदारांना धमकी दिली गेली असल्याने ते पुढे येत नाहीत, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, असा दावाही वकिलांनी केला.
या युक्तिवादानंतर न्यायालयाने एनआयएला 9 जूनपर्यत आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ दिली.