मुंबई- मुंबई मधील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर तोडगा निघाल्याचं दिसत आहे. बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार सेनेत आज 2016 ते 2021 या कालावधीसाठी करार झाला असून, कामगारांना पगारात 5 ते 12 हजार रुपयांची वाढ होणे अपेक्षित असल्याचं कामगार सेनेनं म्हंटलं आहे. मात्र, शशांक राव यांच्या बेस्ट कामगार कृती समितीने या करारानुसार कर्मचाऱ्यांना तुटपूंजी पगारवाढ मिळणार असल्याचं सांगत गणेशोत्सवानंतर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे कृती समितीने आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारपासून बेस्ट कामगार कृती समितीचे प्रमुख शशांक राव उपोषण आंदोलन करत आहेत. मात्र, उपोषणादरम्यान शशांक राव यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात पगारवाढीच्या मुद्द्यावर बुधवारी चर्चा झाली. या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या वेतन करारासाठी मुंबई महानगरपालिकेने 780 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदरी केवळ 8 ते 10 टक्के पगारवाढ मिळणार असल्याचं म्हणत, बेस्ट कामगार कृती समितीने या कराराला नकार दर्शवला. आणि कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.