नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराशी संबंधित एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. संबंधित प्रकरण भाजपच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येशी निगडीत आहे. मृत कार्यकर्त्यांच्या कुटूंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने दर्शवली आहे.
बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल 2 मे यादिवशी जाहीर झाला. त्यानंतर त्या राज्यात विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. तशाच घटनांवेळी हत्या झालेल्या भाजपच्या दोन कार्यकर्त्यांच्या कुटूंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
संबंधित प्रकरणात तक्रार देऊनही बंगाल पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे न्यायालयाच्या देखरेखीखाली त्या प्रकरणाची चौकशी सीबीआय किंवा विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) मार्फत व्हावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावरून न्यायालयाने केंद्र आणि बंगाल सरकारांना नोटिसा बजावून उत्तर मागवले आहे.
याचिकेवरील सुनावणीसाठी न्यायालयाने 25 मे हा दिवस निश्चित केला आहे. बंगालमधील हिंसाचारावरून तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही पक्ष हिंसाचाराचा ठपका एकमेकांवर ठेवत आहेत.