धुब्री, दि. 14 – आसामातील रानपगली या भागात पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला घाबरून पळून आलेल्या भाजप समर्थकांच्या आश्रयासाठी एक छावणी उभारण्यात आली असून निर्वासितांच्या या छावणीला पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी आज भेट दिली.
तेथे त्यांनी निर्वासितांची विचारपूस केली. तृणमूल कॉंग्रेसने निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील अनेक भागात भाजप समर्थकांवर हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांच्या भीतीपोटी अनेक भाजप समर्थकांनी तेथून पलायन केले आहे. हे लोक सध्या येथील छावणीत राहात आहेत. आम्ही जीव वाचवून येथे आलो असलो तरी आमच्या घरांची तृणमूलच्या समर्थकांनी मोठी नासधूस केली आहे, अशी तक्रार येथील बहुतांश लोकांनी केली आहे.
राज्यपाल धनकर हे कुचबिहारपर्यंत हेलिकॉप्टरने आले. पण तेथून त्यांचे हेलिकॉप्टर खराब हवमानामुळे उडू शकले नाही त्यामुळे त्यांना या छावणीपर्यंत मोटारीने यावे लागले. तत्पूर्वी राज्यपालांनी सीताकुलची येथे भेट दिली त्यावेळी स्थानिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या या भेटीला विरोध दर्शवला होता. दिनहाटा येथेही राज्यपालांना गोबॅकच्या घोषणांचा सामना करावा लागला होता.
राज्यपालांनी हिंसाचारग्रस्त कुचबिहार जिल्ह्याला भेट देण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध केला होता. राज्यपालांचा हा दौरा घटनाविरोधी असल्याची तक्रारही मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण आपण घटनेने दिलेली जबाबदारीच पार पाडीत आहोत, अशा शब्दांत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा विरोध फेटाळला होता. राज्यपालांनी आसामातील निर्वासित भाजप समर्थकांच्या छावणीला भेट दिली त्यावेळी भाजपचे खासदार नितीश प्रामाणिकही त्यांच्या समवेत होते.