सागरदिघी – भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मनरेगा निधीच्या वितरणाबाबत पश्चिम बंगालला सापत्न वागणूक देऊन आमच्यावर अन्याय करीत आहे अशी तक्रार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. या योजनेचे पश्चिम बंगालचे केंद्राकडे 6,000 कोटी रुपये थकीत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपशासित राज्यांना मात्र या रोजगार योजनेसाठी निधी दिला जात आहे आम्हाला मात्र निधी देण्यास टाळाटाळ केली जात आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की, मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनाच्या अंमलबजावणीत आमचे राज्य पहिल्या क्रमांकावर असूनही पश्चिम बंगाल अशा भेदभावाला का सामोरे जात आहे? सध्या आम्ही कोणत्याही केंद्रीय मदतीशिवाय योजना चालवत आहोत,असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय योजनांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्राकडून आमच्या राज्यात वारंवार पथके पाठवली जात आहेत. हा प्रकार केवळ आम्हाला छळण्यासाठीच केला जात आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की, भाजपच्या नेत्याच्या घरात शेकोटी घुसली तरी एक केंद्रीय पथक पश्चिम बंगालला पाठवले जाते. मात्र कोणत्याही गंभीर घटनांवर उत्तर प्रदेश, दिल्ली किंवा गुजरातमध्ये अशी टीम का पाठवली जात नाही? केंद्र सरकार क्षुल्लक बाबींवर केंद्रीय पथके पाठवून पश्चिम बंगालला त्रास देत आहे असा आरोपही त्यांनी केला.