शेवगाव – येथे आमदार मोनिकाताई राजळे यांचे अध्यक्षतेखाली आज संजय गांधी निराधार योजना समितीच्या झालेल्या बैठकीत विविध निराधार योजनांच्या तब्बल 2800 नवीन लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या योजनांच्या शेवगाव तालुक्यातील लाभार्थांची संख्या 20 हजार 739 वर पोहचणार आहे.
या संदर्भात माहिती देतांना आमदार राजळे म्हणाल्या, वृध्द, गरीब, अपंग, विधवा, परित्यक्ता समाजातील अशा निराधारांना भारतीय जनता पार्टीच्या शासनाने सढळ हस्ते मदत केलेली आहे. आत्तापर्यंत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा 600 रूपये अनुदान दिले जाणाऱ्या सर्व साधारण 2798 लाभार्थ्यांसह 800 रूपये दरमहा मिळणारे चाळीस ते एकोणऐंशी टक्के दिव्यांग 210 तर दरमहा एक हजार रुपये अनुदान दिले जाणारे एकोणऐंशी ते शंभर टक्के दिव्यांग. 76 असे एकूण 3084 संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असून त्यांना जून 2019 चे 19 लाख 21 हजार 600 रुपये अदा करण्यात आले आहेत.
तसेच श्रावणबाळ निवृती वेतन व इंदिरा गांधी निवृत्ती योजनेच्या केंद्र शासनामार्फत मिळणाऱ्या (अ गट) 5 हजार 886 लाभार्थ्यांना जूनचे 35 लाख 31 हजार 600 रुपये अदा करण्यात आले आहेत. तर राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेच्या 7269 सर्वसाधारण अनुसुचित जाती व जमातीच्या 1700 लाभार्थ्यांना जूनचे 53 लाख 81 हजार 400 रुपयेही अदा झाले आहेत. थोडक्यात या निराधार योजनेच्या तालुक्यातील एकूण 17 हजार 939 लाभार्थ्यांना जून महिन्यात भाजपा शासनाने तब्बल एक कोटी 27 लाख 56 हजार 200 रुपये अनुदान स्वरुपात वितरीत केले आहेत. आता या लाभार्थ्यामध्ये आजच्या मंजूरीमुळे संजय गांधी योजनेच्या 300 तर राज्य श्रावणबाळ योजनेच्या दोन हजार 500 लाभार्थ्यांची भर पडणार आहे.
एकूणच आपल्या अवघ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण वंचित घटकांना न्याय देतांना या निराधार योजनामध्ये मोठया प्रमाणात नवीन लाभार्थ्यांना सामावून घेतल्याचे सांगून त्यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस तहसीलदार डॉ. विनोद भामरे, नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य भाजपा तालुकाध्यक्ष बापू पाटेकर, वाय. डी. कोल्हे, बंडू रासने आदि उपस्थित होते. पी. ई. गोरखे, नितीन गरगडे, देवीदास फलके आदींनी समितीला मदत केली.