पुणे (प्रभात वृत्तसेवा) – बेळगाव मधील सीमावासीयांनी आज (दि. 1 नोव्हेंबर) काळा दिन पाळण्याचे आवाहन केले असून, त्यामध्ये महाराष्ट्र सरकारमधील मंत्री सर्व सहभागी आहेत. विधिमंडळामध्ये याबाबत सातत्याने केंद्र सरकारचे लक्ष वेधत असतो. या लढयातुन लवकर न्याय मिळण्यासाठी आपण सगळे एकजुटीने राहू, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलीम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राचा अनेक भाग बेळगाव, निपाणी, कारवा, भालकी, बिदर हा कर्नाटक व्याप्त आहे. ज्यावेळेला महाराष्ट्राची नवीन निर्मिती झाली, त्यावेळेनंतर अनेक भागातील सीमा भागावरती सीमावासीय बांधवांना कर्नाटक मध्ये राहणे भाग पडले, अशा पद्धतीने निवाडा केंद्र सरकारने केला. त्यानंतर आजपर्यंत न्यायालयात खटले सुरू असून, त्याबाबत महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषद मध्ये अनेक वेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या बाजुने ठराव झालेले आहेत.
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, यांना अटक झाली होती आणि फार मोठा संघर्ष संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरती शिवसेनेने केलेला आहे. या लढयात हुतात्मे झालेत त्यांना अभिवादन करत, बेळगाववासीयांचा लढा हा त्यांचा एकट्याचा नसून, या लढ्यामध्ये महाराष्ट्राची जनता सहभागी आहे, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी दिला.