मुंबई : दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते. मात्र, ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील हे आंदोलन पोलिसांनी सामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना त्रास होत असल्याचे कारण देत आझाद मैदानावर स्थलांतरित केले होते. अखेर या आंदोलक विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावरील आपले आंदोलन मागे घेतले आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील आमचे ठिय्या आंदोलन यशस्वी झाले असून आम्ही आमचे आंदोलन मागे घेत आहोत. पण आमचा विरोध कायम आहे, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
Kapil Agarwal,protester: We were forcibly shifted here to Azad Maidan by Police. But now we have called off our ‘occupy Gateway of India’ protests, it was a successful protest. Our resistance will continue, we have a long line up of programs. #Mumbai pic.twitter.com/5jiYaLflDI
— ANI (@ANI) January 7, 2020
रविवारी सांयकाळी जेएनयू येथे विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ मुंबईत रविवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कॅंडल मार्च काढत ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ठिय्या आंदोलन सुरु केले होते. पोलिसांनी मंगळवारी सकाळी येथील आंदोलकांना ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून आझाद मैदानावर आणून सोडले.
‘गेट वे ऑफ इंडिया’वर आंदोलन करण्यास परवानगी नसतानाही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. सामान्य नागरिक तसेच पर्यटकांना समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु, आंदोलक पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर बलप्रयोगाचा वापर करुन पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानावर हलवले होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. आझाद मैदानावर आल्यानंतरही आंदोलक ‘गेट वे ऑफ इंडिया’वर आंदोलन करण्यावर आग्रही होते. परंतु, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर आंदोलकांनी आमचे आंदोलन यशस्वी झाले असून आता आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.