रामायण या नव्वदीच्या दशकात बहुलोकप्रिय ठरलेल्या मालिकेने अक्षरशः एक काळ गाजवला. कोरोनाविरुद्धच्या लढाईतील लॉकडाऊनची पर्वणी साधून ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली आणि पुन्हा तितक्याच प्रमाणात तिला प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील राम, सीता, रावण, लक्ष्मण, हनुमान यांच्या व्यक्तिरेखा साकारलेल्या कलाकारांना या मालिकेमुळे प्रचंड ग्लॅमर मिळालं.
त्याचबरोबर सुग्रीव आणि मेघनाथ उर्फ इंद्रजीतची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांनाही ओळख मिळाली. यातील सुग्रीवाची भूमिका श्याम सुंदर यांनी साकारली होती. अलीकडेच त्यांचे निधन झाले. सुरुवातीला अशी बातमी समोर आली होती की रामायण पाहता पाहताच त्यांनी जगाचा निरोप घेतला; परंतु नंतर त्यांची मुलगी जिया हिने सांगितले की, ते वृत्त खोटे आहे. रामायण मालिका सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. याच वृत्तामध्ये त्यांना कर्करोग झाला होता, असेही म्हटले होते; पण तेही खोटे आहे.
नियमित दिनचर्येनुसार ध्यान आणि प्रार्थना करण्यासाठी ते पहाटे 3 वाजता उठले होते. ही प्रार्थना सुरू असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची नात नीलम सांगते की, 88 वर्षे वयाच्या माझ्या आजोबांना वृद्धावस्थेशिवाय अन्य कसलाही त्रास नव्हता. त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला आहे. असे असताना त्यांना कॅन्सर झाल्याची अफवा कुणीतरी पसरवली. अशा प्रकारांमुळे आम्ही कुटुंबीय खूप दुःखी आहोत असे ती म्हणते !