पुणे – ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी 14 टक्क्यांनी वाढ केली आहे. सर्व संघटनांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांविषयी बैठक पार पडली. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आदींसह कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दांडेगावकर म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी 14 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना 35 ते 45 रुपयांची रक्कम वाढवून मिळणार आहे.
राज्यातील साखर कारखान्यांना या दरवाढीसाठी सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये गतवर्षीच्या तुलनेत अधिक द्यावे लागणार आहेत.