शालिनीताई ऐवजी दुसऱ्याच सदस्याला दिली जाणार संधी
महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना लावणार सुरुंग
नगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड अवघ्या दोन दिवसावर आली असून भाजपने अर्थात विखेंनी यात उडी घेतल्याने नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली आहे. विखेंनी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांना सुरुंग लावण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचबरोबरच चारही अपक्ष आपल्या गळाला लावण्याचे डावपेच आखले आहेत. विखेंच्या एन्ट्रीने सुरुवातीला महाविकास आघाडीला सहज सोपी वाटणारी निवडणूक आता अडचणीची ठरू शकते,असा होरा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
कॉंग्रेस थोरात समर्थक 13,राष्ट्रवादी 19,शिवसेना 7 व शेतकरी क्रांतीकारी पक्ष 5 असे एकूण 44 सदस्यांचे ठोस बहुमत व काही अपक्ष गळाला लावण्याचे धोरण महाविकास आघाडीने आखून भाजप व विखे यांना शह देण्याची जोरदार तयारी चालवली होती. पण काल माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत उतरण्याचा निर्णय घेतला अन या लढतीतील रंगत आपोआप निर्माण झाली. खासदार सुजय विखे तर आधी तीन-चार दिवसापासूनच या निवडणुकीची तयारी करत आहेत.
कॉंग्रेसच्या 23 सदस्यांपैकी 10 विखे यांच्यासोबत व 13 जण थोरात यांच्यासोबत असे चित्र होते. पण आता थोरात यांच्या गोटातील चार सदस्य फ ोडण्याचे नियोजन विखे यांनी केले आहे. त्यामुळे थोरात यांच्याकडे त्यांच्या संगमनेर तालुक्यातील नऊच सदस्य उरतील असे चित्र आहे. दुसरीकडे अकोल्यासह इतर तालुक्यातील राष्ट्रवादी सोडून भाजपात आलेल्या नेत्यांचे समर्थक सदस्य भाजपच्या कळपात राहणार असल्याची माहिती समजते.
राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले पाच सदस्य भाजपसोबत राहू शकतात. तर शिवसेनेच्या सात सदस्यांपैकी चार सदस्य विखेंच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे. तसेच चारही अपक्ष भाजपच्या गळाला लागु शकतात. असे झाले तर भाजप 13,विखे समर्थक 10, थोरात गटातील 4,राष्ट्रवादीतील 5,शिवसेनेतील 4 व अपक्ष 4 असे हे 40 चे समीकरण भाजप व विखेंना बहुमतापर्यंत नेवू शकते.असे झाल्यास महाविकास आघाडीला मोठा हादरा ठरू शकतो. तसेच शालिनीताई विखे यांच्या नावाला भाजपातूनच विरोध होवू नये यासाठी दुसऱ्या सदस्याला अध्यक्षपदाची संधी देण्याची चाल विखे गट खेळणार आहे.