पुणे : मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थान व संलग्न गुजरातच्या काही भागातून आजपासून सुरवात झाली आहे. सर्वसामान्यपणे 17 सप्टेंबर रोजी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो असे मानले जाते. मात्र अलीकडील काळात मान्सूनच्या परतीचा प्रवास उशिरा सुरू होत असून, यंदादेखील मान्सूनच्या परतीचा प्रवास 20 दिवस उशिराने सुरू झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य भारताच्या पश्चिम भागात कमी पातळीवर वाऱ्यांचे चक्रीय अभिसरण (ऍन्टी सयक्लोन) होत असून आणि या भागात बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणात झालेली लक्षणीय घट लक्षात घेता, या भागातून मान्सूनच्या परतीस सुरवात झाले असल्याचे विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
गेल्या पाच वर्षांमधील पश्चिम राजस्थानमधून मान्सूनच्या परतीचा प्रारंभ :
2016 : 15 सप्टेंबर
2017 : 27 सप्टेंबर
2018 : 29 सप्टेंबर
2019 : 09 ऑक्टोबर
2020 : 28 ऑक्टोबर
परतीच्या पावसाची रेषा सध्या बिकानेर, जोधपूर, जालोर, भुज या भागामधून जात आहे. पुढील ती ते चार दिवसाच्या दरम्यान गुजरात, संपूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून नैऋत्य मान्सूनच्या माघारीसाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे.