कराड – मौजे अतित व माजगाव ता. सातारा येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने उरमोडी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे उरमोडी नदीला महापूर येवून, या पुराच्या पाण्यासोबत अनेक झाडेझुडपे, लाकडे व इतर वस्तू अडकून बसलेली होती. पूर ओसरल्याने आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बंधाऱ्यातील झाडेझुडपे काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
सह्याद्री साखर कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणच्या बंधाऱ्यामध्ये अशाप्रकारे लाकडे अडकल्याने बंधाऱ्याचा भरावा वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे आ. पाटील यांनी सह्याद्री कारखान्याचे सिव्हिल, शेती, इंजिनिअरींग आणि इरिगेशन विभाग यांच्या संयुक्त समितीकडून तांत्रिक सर्वेक्षण करून घेवून पालकमंत्री ना. विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि अधिक्षक अभियंता, कृष्णा-कोयना जलसिंचन प्रकल्प यांच्याकडे बंधाऱ्याची दुरूस्ती करणेची मागणी केली आहे.
आ. बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याचे जेसीबी मशीन, हायड्रा क्रेन उपलब्ध करून दिले आहेत. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत कार्यक्षेत्रातील इतर बंधाऱ्यामधील अडकलेली झाडेझुडपे, लाकडे काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच बंधाऱ्यांच्या पुनर्बांधणीचे कामही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.