खासदार संजय राऊत यांची अधिवेशनापुर्वी सरकारवर टीका
नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत सत्तास्थापनेच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आल्याची घोषणा भाजपाने रविवारी केली. त्यानंतर लगेचच लोकसभेमधील शिवसेनेच्या खासदारांची आसनव्यवस्थेतही बदल करुन त्यांनी विरोधी बाकांवर बसण्यास सांगण्यात आले. यावरुनच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन मोदी सरकार आणि सत्ताधाऱ्यांना कवीतेच्या ओळी पोस्ट करत खोचक टोला लगावला आहे. पाकिस्तानमधील दिवंगत कवी हबीब जालिब यांच्या कवितेच्या ओळी राऊत यांनी ट्विट केल्या आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त राऊत हे दिल्लीमध्ये आहेत. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन सकाळी आठच्या सुमारास एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी तुम से पहले वो जो इक शख़्स यहॉं तख़्त-नशीं था…उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था, या हबीब जालिब यांच्या कवितेती ओळी पोस्ट केल्या आहेत. तुमच्याआधी येथे जो सत्ताधारी होता तोही स्वत:ला देव समजायचा असंच राऊतांना या ट्विटमधून सूचित करायचे आहे. आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये राऊतांबरोबर शिवसेनेच्या सर्व खासदारांना विरोधकांच्या बाकड्यावर बसावे लागणार आहे. त्यावरुनच त्यांनी सत्ताधाऱ्यांना हा टोला लगावला आहे.