नवी दिल्ली – नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर नितीश कुमारही मुख्यमंत्री होऊ शकतात, असे बिहारचे नवे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. तेजस्वी यादव आज संध्याकाळी 5.30 वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकतात, अशी शक्यता असताना त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
अशी चर्चा सुरु आहे की, सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत तेजस्वी यादव राज्यातील मंत्रिमंडळाची स्थापना आणि काँग्रेसमधील मंत्र्यांच्या समावेशाबाबत चर्चा करू शकतात. 2015 च्या महागठबंधन सरकारमध्ये काँग्रेस देखील सरकारचा एक भाग होता. यावेळीही काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होऊ शकते.
तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या पंतप्रधान होण्याच्या शक्यतेवर स्पष्टपणे सांगितले की, ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर नितीश कुमारही पंतप्रधान होऊ शकतात. मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक अनुभव नितीश कुमारांचा आहे आणि त्यांच्याइतके उंच कोणीही नाही. तसेच तेजस्वी म्हणाले की, नितीश कुमार यांना पंतप्रधान व्हायचे आहे की नाही, ते त्यांच्यावर अवलंबून आहे.’
एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे आणि सर्वांनी एकजूट राहावे, असे आवाहन नितीश कुमार यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांना केले आहे.