बीड : शॉक लागून माय लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किट्टी आडगाव तालुका बीड येथे ही घटना घडली आहे. शशिकलाबाई शंकरराव फपाळ (वय ६५) आणि सखुबाई फपाळ (वय ४५) असे मृत मायलेकीचे नाव आहे. मागील दहा दिवसांपासून अनेक घरात विद्युत प्रवाह उतरला असल्याच्या तक्रारी येथील ग्रामस्थांनी महावितरणकडे केल्या होत्या मात्र महावितरणकडून याकडे दुर्लक्ष केले गेले आणि आज हा प्रकार घडला.
बीड मधील किट्टीआडगाव येथे शशिकलाबाई शंकरराव फपाळ या मुलगी सखुबाई सोबत राहत होत्या. रविवारी सकाळी ६ वाजता झोपेतून उठल्यानंतर शशिकलाबाई यांचा हात भिंतीला लागला. त्यावेळी त्यांना तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. आईला काय झाले हे पाहण्यासाठी गेली असता यावेळी मुलगी सखुबाई हिला देखील तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. विजेचा शॉक तीव्र असल्यामुळे दोघीही मायलेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे किट्टीआडगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्ळक्ष केल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. किट्टीआडगाव पाटील गल्ली येथे मागील दहा दिवसांपासून अनेक घरात विद्युत प्रवाह उतरला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी महावितरणकडे केल्या होत्या. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही पाहणी करण्यात आली नसून हा प्रकार घडला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमकडून संताप व्यक्त केला जात आहे.