बीड – बजाज अलियान्झ या कंपनीकडे काही वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील पीक विमा घेण्याची आणि नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना तो विमा परत देण्याची जबाबदारी होती. या कंपनीच्या खात्यातून तब्बल 12 कोटी रुपये बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून जमा झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून पैसे जमा झाल्याची बाब लक्षात येताच कंपनीने बॅंकेला पत्र पाठवले असून 12 हजार शेतकऱ्यांकडून 12 कोटी रुपये रक्कम वसूल करण्याचे सांगितले आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. त्यांनी सदर पैसे परत करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. बीड जिल्ह्यातील किसन म्हस्के या शेतकऱ्याच्या खात्यावर 11 हजार रुपये जमा झाले आहेत. रक्कम जमा झाल्यानंतर मस्के यांनी रक्कम बॅंकेतून काढून घेतली आहे. तर आता ही रक्कम आपण परत करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हंटेल आहे. शेतकऱ्यांनी कंपनीचा दावा फोल असल्याचा दावा केला असून ही रक्कम नुकसानीपोटी भरलेल्या विम्याची आहे, यातील एक रुपयाही आम्ही परत करणार नाही, असे बहुतांश शेतकऱ्यांनी म्हंटले आहे. नजरचुकीने आलेले कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.