वेल्हे (प्रतिनिधी)- राजगडावर जाणाऱ्या वांजळे (ता.वेल्हे) येथील एकाच कुटुंबातील सात जणांवर रवीवारी (दि.३१) मधमाश्यांनी हल्ला चढवला असून त्यामध्ये २ जण गंभीर जखमी झाले होते.
संबंधित पर्यटकांवर सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये रामचंद्र केसू धरपाळे (वय ६०), सुलोचना अंकुश धरपाळे (वय ४५), विमल विजय धरपाळे (वय ४०), राहुल एकनाथ धरपाळे (वय १३), शितल श्रीरंग धरपाळे (वय २२), निकिता रामचंद्र धरपाळे (वय २०), पुष्पा लक्ष्मण पवार (वय १८) सर्व राहणार वांजळे येथील रहिवाशांचा समावेश आहे.
मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी उपचारादरम्यान उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने याबाबतची माहिती वेल्हे पोलीस ठाण्याला कळवून सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससूनच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या सर्वांना घरी सोडण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले.