एसीबीने अटक केलेले समजताच वधू पक्षाने दिला लग्नास नकार
तोतया पोलीस म्हणून लाच स्विकारत असताना केली होती त्याला अटक
पुणे – पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याप्रकरणात लाचुलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्याला चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. हातात बेडी पडल्याने वधू पक्षाकडील लोकांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे पोलिसांच्या बेडीत अडकल्याने तो लग्नाच्या बेडीला मुकला आहे.
माधव (नाव बदलले आहे) असे त्याचे नाव आहे. लग्नाच्या एक दिवस आधीच एसीबीने त्याला आणि त्याच्या साथीदाराला 1 लाख 6 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. तक्रारदाराच्या विरोधात गुन्हे शाखेने मोहननगर येथे तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे असल्याचे सांगत आणि पोलिस असल्याची बतावणी करून तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली होती. माधव याचे सातारा जिल्ह्यातील एका मुलीशी लग्न ठरले होते.
गुरुवारी दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी सातारा येथे त्यांचा विवाह होता. त्यामुळे जामीन मिळाला नसता तर लग्न पुढे ढकलावे लागले असते. मात्र त्यांचे वकील ऍड. प्रताप परदेशी यांनी त्याचे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे जामीन देण्याची मागणी मान्य करीत विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी त्याला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडले. 4 वाजता जामीन मिळाल्यानंतर साडेचारच्या सुमारास वऱ्हाड लग्नाच्या ठिकाणी जायला निघाले. मात्र मध्येच त्यांना लग्न मोडल्याचे समजले. त्यामुळे वऱ्हाडी हाताश झाले. तोतया पोलिसाच्या लग्नाचा डाव अर्ध्यावरच मोडला. दोन्ही पक्षांनी केलेली लग्नाची तयारी देखील वाया गेली.