बिबट्याच्या दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत
लाखणगाव-आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील उसाची तोडणी सुरू असून उसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे बिबट्याची मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागला आहे. लाखणगाव (ता. आंबेगाव) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी व कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील दौंड, पाचारणे वस्तीवरील शेतकरी भिकाजी तुकाराम दौंड यांच्या घरासमोर असणाऱ्या दोन शेळ्यांमधील एका शाळेवर सायंकाळी बिबट्याने हल्ला करून शेळी ओढून नेली.
यामुळे भिकाजी दौंड यांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याच शेळीने पाच दिवसांपूर्वी तीन करडांना जन्म दिला आहे. त्यामुळे या करडांना गायीचे दुध पाजून जगवावे लागत आहे. शनिवारी रात्री दौंड यांच्या घरासमोर पुन्हा बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला. मात्र रविवारी सकाळी या कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे दौंड पाचारणे वस्तीवर दहशतीचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे काठापूर बुद्रुक येथे मागील दोन दिवसांपासून सायंकाळच्या वेळी किसन जनाजी करंडे व मयूर सोपान करंडे यांनाही बिबट्याचे दर्शन झाले.
- कायमस्वरुपी उपाय योजना करा-
वन विभागाच्यावतीने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.त्याच प्रमाणे शेळीचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्याला वन विभागाच्यावतीने नुकसान भरपाई मिळावी. मागील अनेक वर्षापासून लाखणगाव आणि काठापूर परिसरात अनेक बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केले असूनही अनेक वेळा बिबट्याचे दिवसाही दर्शन होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांसाठी कायमस्वरुपी उपाय योजना करावी, अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांची आहे.