कोल्हापूर – पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणप्रकरणी एका महिलेसह 7 जणांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. आज जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निकाल दिला. सरकारी वकील म्हणून ऍड.मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.
सुरेश संजय पाटील (वय 33), अजित वसंत पाटील (29), संजय केरबा पाटील (61), वसंत केरबा पाटील (51), सागर संजय पाटील (36), विनायक वसंत पाटील (26) आणि नकुशा ऊर्फ लक्ष्मी वसंत पाटील (46, रा. सर्व कोतोली, ता. पन्हाळा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याबाबत निलेश जयसिंग पाटील (वय 28, रा. कोतोली) यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
कोतोली येथील फिर्यादी निलेश पाटील व सर्व आरोपी यांच्यामध्ये जमिनीच्या वादावरून पोलीस पाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, 10 मे 2014 रोजी बंदी आदेश असताना आळीपाठ गल्लीमध्ये निलेशचे काका बाजीराव पाटील यांना आरोपींनी मारहाण केली. त्यावेळी निलेश याच्यासह 6 जण भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपी संजय पाटील यांनी निलेशला लोखंडी फावड्याने तर वसंत पाटील याने युवराज पाटील यांना लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले.
तर सागर, विनायक, अजित, सुरेश आणि नकुशा यांनी काठ्यांनी लाथाबुक्क्यांनी इतरांना मारहाण केली. त्यानंतर निलेश याने सर्व आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.