अहवाल मागाविला
एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांचे वाढते गैरहजेरीचे प्रमाण लक्षात घेऊन त्यासंदर्भात मुख्य कार्यालयाने सर्व विभागीय नियंत्रकांकडून अहवाल मागविला आहे. त्यानुसार दांडीबहाधुरांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे महामंडळाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे – उन्हाळी सुट्टया आणि लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांचे गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. मुख्यालयात अधिकारीच हजर राहात नसल्याने प्रवासी सेवेवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे महामंडळाच्या महसूलात घट होत आहे. त्याची गंभीर दखल एसटी महामंडळाच्या प्रशासनाने घेतली आहे. मुख्यालयात वेळेवर हजर राहा;अन्यथा दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाईला सामोरे जा, असा इशारा महामंडळाने आगारप्रमुखांना दिला आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत एसटी महामंडळाने आपल्या कारभारात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाने आरामदायी आणि वातानुकुलित बसेस ताफ्यात आणल्या आहेत. त्यामुळे महामंडळाच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. त्यातूनच महामंडळाचा महसूलही वाढला आहे. मात्र, हा महसूल आणि प्रवाशांची संख्या वाढत असतानाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. त्याचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे.
त्यासंदर्भात अनेक प्रवाशांनी राज्याचे परिवहन मंत्री आणि महामंडळाचे उपाध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकाराची रावते यांनी गंभीर दखल घेतली असून शुक्रवारी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानुसार राज्यभरातील सर्व विभागीय नियत्रंकांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी “दैनिक प्रभात’शी बोलताना दिली.
…तर कठोर कारवाईला समोरे जावे लागेल
एसटी महामंडळ प्रवाशांना सेवा देण्यास तप्तर आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत त्यासंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा देऊन देओल म्हणाले, प्रत्येक आगारप्रमुखांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी हजर राहाणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात महामंडळाच्यावतीने यापूर्वी वारंवार सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, हे वास्तव असतानाही बहुतांशी आगारप्रमुख मुख्यालयात हजर राहात नसल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे, त्यानुसार यापुढील कालावधीत आगारप्रमुखांना मुख्यालयात हजर राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कसूर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही देओल यांनी दिला.