मुंबई – राज्यभरात करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात करोनायोद्धांना ही लस दिली जाणार असून टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण सुरु होताच सायबर चोरटेही सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणत्याही लस नोंदणीच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
अनिल देशमुख म्हणाले कि, राज्यात करोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत.
अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही माहिती सामायिक करू नये, असे मी आवाहन करतो. तसेच या फोन कॉल्सची नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी.जेणेकरून पोलीस या सायबर हल्लेखोरांवर नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले आहे.
अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही माहिती सामायिक करू नये, असे मी आवाहन करतो.तसेच या फोन कॉल्सची नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी.जेणेकरून पोलीस या सायबर हल्लेखोरांवर नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करतील.(२/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 16, 2021
दरम्यान, राज्याव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात झाली. मुंबईमधील एकूण ९ केंद्रांवरील ४० बूथवर लसीकरण केले जाणार आहे.
आपण आज क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत. या बद्दल कुणाचही दुमत असण्याची शक्यता नाही. हेच ते ठिकाण आहे जे करोना रुग्णांनी तुडूंब भरून वाहत होतं. मात्र, जीवाची पर्वा न करता करोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मी मानाचा मजुरा करतो. असं म्हणत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनाचेही अभिनंदन केले.