नवी दिल्ली : सध्या देशात उन्हाचा पारा वाढत असल्याची दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढत असून, बहुतांशी भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. दिल्लीपासून ते उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, केरळ आणि काही राज्यांत उष्णता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशसह हिमाचल आणि झारखंडमध्ये येत्या 24 तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, एप्रिल महिन्यात कडक उन्हाचा अंदाज वर्तवला जात आहे. हवामान विभागाने तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास होत आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये, पूर्व आणि आग्नेय हवेचा प्रवाह पृष्ठभागापासून 0.9 किमी पर्यंत जात आहे. केवळ राज्याच्या नैऋत्य भागात, पश्चिमेकडील आणि उत्तर-पश्चिम हवेचा प्रवाह पृष्ठभागापासून 1.5 किमी पर्यंत राहतो.
हवामानातील बदलांमुळे बिहारच्या उत्तर-पूर्व भागात काही ठिकाणी पुढील दोन दिवस अंशतः ढगाळ आकाशासह हलका पाऊस ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असून अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चढताच आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आलं. तर काही जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर होते. सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला (44 अंश सेल्सिअस) आणि त्यानंतर मालेगाव, चंद्रपूर (43 अंश सेल्सिअस) इथे झाली.