नागपूर – सध्या राज्यातील तापमानात पुन्हा वाढ होत आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. या वाढत्या उष्णतेचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी पार केली आहे. गुरुवारी, अकोला आणि वर्ध्यात आज सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या एक ते दोन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला असून, काही जिल्ह्यातील तापमान 45 अंशावर जाणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे तापमान कमी झाले होते. मात्र, आता मे महिन्याच्या मध्यात सूर्य तळपायला लागला आहे. उत्तरेकडून उष्ण वारे विदर्भात येत आहेत. त्यामुळे तापमानात अचानक वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे विदर्भवासियांना संपूर्ण मे महिना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.
पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे “मोका’ नावाच्या चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. त्यामुळे वायेव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा वेग वाढल्याने तापमानात एकाएकी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या परिस्थिती सकाळपासूनच नागपूरकरांना कडक उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.
मालेगावात हंगामातील उच्चांकी तापमान –
नाशिकच्या मालेगाव शहरात तापमानाचा पारा या हंगामातील सर्वात उच्चांकी नोंदविला गेला आहे. शहरातील तापमान 43.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. वाढता उन्हाचा पारा आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या झळांमुळे रस्त्यांवर फिरणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे दुपारी प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे.
सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने टोपी, उपरणे, गॉगल आदींचा आधार घ्यावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे एकूण कामकाज आणि येथील जनजीवनावरही परिणाम झाला आहे. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून शीतपेय घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.