नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूचा आकडादेखील चांगलाच वाढला आहे. दरम्यान, एका दिवसात देशात तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, पुढच्या आठवड्यात कदाचित देशभरात मोठ्या संख्येने रुग्णवाढ होईल, असा इशारा केंद्र सरकारला करोनासंदर्भात सल्ला देणाऱ्या पथकातील तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या चर्चेदरम्यान, आपण दीर्घ काळासाठीच्या उपाययोजनांमध्ये फार वेळ न घालवता आत्ता उद्भवलेल्या परिस्थितीवर तातडीने पावलं उचलणं गरजेचे आहे, असा देखील संदेश या पथकाने केंद्र सरकारला दिला आहे. एकीकडे देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि लसीच्या डोसचा अपुरा पुरवठा असताना रुग्णवाढीचे आव्हान समोर उभं ठाकणार असल्याचा इशारा आता तज्ज्ञांनी दिला आहे.
केंद्र सरकारला करोनासंदर्भात सल्ला देणाऱ्या संशोधकांच्या पथकाचे प्रमुख एम. विद्यासागर यांनी यासंदर्भात यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना माहिती दिली आहे. “आमचा अंदाज आहे की पुढच्या आठवड्यात ३ ते ५ तारखेच्या दरम्यान कदाचित भारतात रोजची सर्वोच्च करोना रुग्णसंख्या नोंदवली जाईल.
गेल्या महिन्यात २ एप्रिलला झालेल्या चर्चेदरम्यान आम्ही सांगितलं होतं की सरकारने जुलै किंवा ऑगस्टमध्ये अंमलात येईल अशा उपाययोजनांवर काम करणं अनावश्यक आहे. कारण तोपर्यंत दुसली लाट संपलेली असेल, पण पुढचे ४ ते ६ आठवडे आपण हा लढा कसा देणार आहोत, ते ठरवणं आवश्यक आहे. दीर्घकालीन उपाययोजना ठरवण्यात खूप सारा वेळ खर्च करू नका. कारण हे संकट आत्ता तुमच्या समोर उभं आहे”, असे ते विद्यासागर यांनी सांगितले.