मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्याने नागरिकांच्या जीवाची लाही लाही केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर सूर्य आगच ओकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चंद्रपूर आणि नागपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यावर्षीच्या मार्च आणि एप्रिलमध्ये तर मागच्या आठ वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. यात तब्बल ३७४ नागरिकांना उष्माघात झाला. तर यातील २५ नागरिकांना उष्माघातामुळे आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. यात सर्वात जास्त ११ जण नागपूरमध्ये मृत्युमुखी पडल्याची समोर आली आहे.
यंदा देशभरात विविध ठिकाणी उष्णतेच्या लाटा आल्याचे समोर आले आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. यंदा मागच्या दोन महिन्यात उष्णतेच्या तीन ते चार लाटांचा सामना राज्याला करावा लागला आहे. विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी या भागांमध्ये तर तापमान ४५ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेल्याची नोंद आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा तीव्र असल्यामुळे उष्माघात झालेल्या रुग्णांची संख्याही वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
एप्रिल महिन्यात राज्यभरात २५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून यात सर्वाधिक ११ मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत, तर याखालोखाल जळगावमध्ये चार, अकोल्यात तीन, जालन्यात दोन आणि अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले असून दोन महिन्यांत ३७४ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
त्यात सर्वाधिक २९५ रुग्ण नागपूर विभागातील, तर ३२ जण अकोला विभागातील आहेत. विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचीही उष्णतेने होरपळ होत असून बहुतांश ठिकाणी तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. त्यामुळे या विभागांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. नाशिक विभागात १४, औरंगाबादमध्ये ११ तर लातूर विभागामध्येही एका रुग्णाला उष्माघाताचा त्रास झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही कमाल तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सियसपर्यंत आहे. पुणे विभागात २० रुग्णांना, तर कोल्हापूर विभागात एका रुग्णाला उष्माघाताचा त्रास झाला आहे.