मुंबई : “मुख्यमंत्री असताना स्वतः अडीच वर्ष काही केलं नाही, आणि याला ते द्या, त्याला हे द्या, आम्ही संपाला पाठिंबा देऊ म्हणत आहेत. जनाची ना मनाची लाज बाळगा, सत्ता गेल्याने पायाखालची वाळू सरकली आहे. पद गेलं आणि वेड्यासारखे बडबडू लागल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. ते सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये बोलत होते.
निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार वैभव नाईक यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की,”शिवरायांचं नाव घेऊन राज्य केलं. मात्र, फितुरी करुन आजही इतिहास उजळला जातो. सहकाऱ्यांवर, लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. आता पायाखालची वाळू सरकली, पद गेल आणि वेड्यासारखे बडबडू लागले.” वैभव नाईक हे भविष्य सांगणारे असल्याचं म्हणत कानाखाली आवाज काढण्याची भाषा राणेंनी केली.
तसेच नारायण राणे दोन महिन्यांत राजीनामा देतील असे वैभव नाईकांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. याला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिले. भविष्य सांगणारा म्हणत वैभव नाईकांच्या कानाखाली मारली असती असे वक्तव्य राणेंनी केले. “जसं मला भेटून गेला आणि मी त्याला कानात सांगितलं. कान पुढे केला असता तर कानफटात मारली असती, सांगायची गोष्ट वेगळीच. मी केंद्रीय मंत्री आहे राजीनामा का देईन असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझा पक्ष आज सतेत्त आहे, सत्तेत ठेवायचा आहे. मोदी सरकारमध्ये 42 ते 45 खासदार निवडून पाठवायचे आहेत, या तयारीला आम्ही लागलो आहेत. आता खासदार पण भाजपचा होईल,” असे राणे म्हणाले.
नारायण राणे पुढे म्हणाले की, “निलेश राणे आणि नितेश राणे ही दोन्ही मुलं महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. मला त्यांच्या कार्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल गर्व आहे.” जिल्ह्यातील विरोधकांचा सामाजिक, विधायक, विकासात्मक काय कार्य आहे? असा सवालही त्यांनी केला.