पुणे – भूमिपुत्रांना सर्व पातळीवर सहकार्य करून त्यांना योग्य त्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आपला महाराष्ट्र आपल्या पायांवर उभा राहण्यासाठी सक्रिय व्हा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिले आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून जिल्हापातळीवरील कोरोना संदर्भात तसेच शेतकरी, आरोग्य यंत्रणा, उद्योग, बाजारपेठ अशा विविध मुद्यांबाबतची तळागाळातील स्थिती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जाणून घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापुढे पुणे जिल्ह्यातील स्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी मांडली. कटके यांनी कोरोना विषयक माहिती देताना त्याअनुषंगाने येणाऱ्या अडचणी तसेच इतर बाबी मुद्देसूदपणे मुख्य मुख्यमंत्री समोर मांडल्या.
यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, आपले राज्य आपण आपल्या पायावर उभे करीत आहोत, याकरिता येथील शेतकरी, भूमिपुत्र मोठा झाला पाहिजे. यासाठी शिवसेनिकांनी तत्पर रहावे. राज्यात ५० हजार उद्योग सुरु झाले असून त्याद्वारे ५ लाखाच्या आसपास मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे, ही समाधानाची बाब असली तरी उद्योग, व्यवसायामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देणे, स्थानिक पातळीवर बेरोजगार उमेदवारांची यादी तयार करून त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीनेही युद्धपातळीवर काम करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विक्री करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून मदत करावी. राज्यात सर्वच रुग्णालयांतील रक्तपेढीतील साठा कमी झाला आहे यातून अन्य शस्त्रक्रियेसाठी अडचणी येत असून याकरिता नियमांतर्गत सर्वत्र रक्तदान शिबिरांचे नियोजन करावे. शिवसेनेमार्फत सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयातील डॉक्टरानाही पीपीई किट पुरवण्यात येणार आहेत. महात्मा जोतीराव फुले विमा योजनेतून सर्वांना आपल्या नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये १०० टक्के मोफत उपचार दिलें जातील याबाबतचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दिड लाख रुग्ण असतील, असा इशारा केंद्र सरकारने दिला असल्याने राज्य शासन पूर्णतः सतर्क आहे. शिवसेनिकांनी ही जिल्हा पातळीवर सतर्क राहावे, आपल्या भागातील स्थिती सतत कळवण्याचे आदेशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना दिले आहेत.