मुंबई – आयसीसीची बैठक अळवावरचे पाणी ठरल्यानंतर बीसीसीआयने मात्र, आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार सुरू केला असून काय वाट्टेल ते झाले तरी यंदाची स्पर्धा होणारच, असे स्पष्ट केले आहे. अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच दिलेल्या प्रतिक्रियेनंतर या स्पर्धेसाठीचा बीसीसीआयचा अट्टहास कायम असल्याचेच दिसून येत आहे.
मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 29 मार्च ते 17 मे या कालावधीत होणार होती. करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हा धोका कायम राहिल्याने ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली. त्यातच जुलै ते डिसेंबर या कालावधीत जगभरातील अनेक मालिका रद्द होण्याचीच चिन्हे दिसू लागल्याने आयपीएलसाठी विंडो निश्चितच मिळेल, असा विश्वास आता बीसीसीआयला वाटू लागला आहे.
येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आयोजित केली जाणार असली तरीही बुधवारी झालेल्या बैठकीत आयसीसीने याबाबत निर्णय घेण्यासाठी आणखी एक महिना वाट पाहणार असल्याचे सांगितल्याने बीसीसीआयच्या आयपीएलच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात मालिका खेळण्यासाठी जाणार असून त्यातील एक सामना 15 ऑक्टोबरला होणार असल्याने तसे पडद्यामागे टी-20 विश्वकरंडक रद्दच होणार असे संकेत मिळत असल्याने आता आणखी एक महिना आयसीसीच्या निर्णयाची वाट पाहण्यात घालवणे योग्य होणार नसल्याचेही अध्यक्ष गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.
एकवेळ मैदाने रिकामी ठेवू, खेळाडूंच्या चाचण्या करू, प्रत्येक संघासह अत्यंत मर्यादित सपोर्ट स्टाफ ठेवू किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त मैदाने एकाच शहरात उपलब्ध झाली तर त्या एकाच शहरात सामने आयोजित करू पण यंदाची आयपीएल खेळवणारच, असे स्पष्ट मत गांगुली यांनी व्यक्त केले आहे.
परदेशात स्पर्धा अशक्य…
दक्षिण आफ्रिका, अमिराती व श्रीलंका या देशांनी आयपीएलच्या आयोजनाचा प्रस्ताव बीसीसीआयला दिला होता. मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने अन्य देशांत आयपीएल घेणे शक्य नाही. सर्व संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफला 14 दिवस विलगीकरण करावे लागेल व त्यासाठी अफाट खर्च होणार असल्याने परदेशात आयपीएल आयोजित करण्याचा पर्याय विचारातही घेऊ शकत नाही, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.