नवी दिल्ली: भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे तसेच स्थानिक स्तरावरील सामन्यांचे धावते वर्णन ऐकण्याची संधी आता आकाशवाणीद्वारे चाहत्यांना मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या सामन्यांच्या समालोचनाचे हक्क आकाशवाणीला दिले आहेत. आगामी दोन वर्षांकरिता त्यांना हे हक्क मिळाले आहेत.
धरमशाळा येथे भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात दिनांक 15 सप्टेंबर रोजी टी-20 सामना होणार आहे. या सामन्यापासूनच आकाशवाणीवर समालोचन केले जाणार आहे. भारताच्या पुरूष व महिला संघांचे सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांचे हक्क त्यांना मिळाले आहेत. रणजी, इराणी, देवधर करंडक व सईद मुश्ताक अली चषक आदी स्थानिक सामन्यांचे समालोचन केले जाणार आहे.