मुंबई – आयपीएल स्पर्धा संपल्यावर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिका संघाशी मालिका खेळणार आहे. तसेच त्यानंतर भारतीय संघ आयर्लंड व इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंवर सातत्याने क्रिकेट खेळण्याचा ताण येऊ शकतो हे लक्षात घेत बीसीसीआयने वर्कलोड मॅनेजमेंट करण्याचे ठरवले आहे.
त्यानुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, महंमद शमी व रवींद्र जडेजा या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत फलंदाजी, गोलंदाजी करत असलेल्या व तंदुरुस्ती सिद्ध केलेल्या हार्दिक पंड्याला या मालिकेसाठी संघात स्थान दिले जाणार असल्याचेही संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
भारतीय क्रिकेटपटूंनी करोनाच्या कालावधीतील काही काळ वगळता सातत्याने मालिका खेळल्या आहेत. त्यामुळेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रोहित व कोहलीसह अनेकांची कामगिरीही खालावली आहे. कदाचित खेळाडूंवर अतिक्रिकेटचा ताण येत असल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रमुख खेळाडू विश्रांतीनंतर आयर्लंड व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी ताजेतवाने होतील.