मोहाली – भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा, कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पंड्याला बीसीसीआयने झटका दिला आहे. पुजारा आणि रहाणे यांच्या कामगिरीत सातत्य नसल्याने त्यांना अ गटातून वगळण्यात आले आहे.
बीसीसीआयने आज खेळाडूंची नवीन करार यादी जाहीर केली. यामध्ये पुजारा आणि रहाणे यांना अ गटातून ब गटामध्ये पाठविण्यात आले आहे. सध्या दोघेही फॉर्ममध्ये नसल्याने त्यांना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे.
तथापि, दुखापतीने त्रस्त असलेल्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यालाही मोठा फटका बसला आहे. त्याला अ श्रेणीतून वगळून थेट क श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
तसेच बीसीसीआयशी थेट पंगा घेणाऱ्या यष्टिरक्षक वृद्धीमान साहाला ब गटातून क गटात स्थान मिळाले आहे. दुसरीकडे भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांचेही डिमोशन, तर कुलदीप यादव व नवदीप सैनी यांना करार स्थान देण्यात आले नाही.