कोलकाता – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी दाखवलेल्या हुशारीमुळे जवळपास 4 हजार कोटींचा तोटा टळला आहे. गांगुली यांच्यासह सर्व सदस्यांनी दाखवलेल्या संयमामुळेच हे शक्य झाले आहे. म्हणूनच यंदाची आयपीएल स्पर्धा अखेर होणार आहे.
जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयचे वर्चस्व देखील या निमित्ताने सिद्ध झाले. आधी श्रीलंका क्रिकेट मंडळाला आपल्या बाजूने करत पाकिस्तानला यजमानपद मिळालेली आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द करून घेतली. तसेच पाकिस्तानवर दबाव टाकत सुपर लीगचे उर्वरित सामनेही रद्द केले गेले. त्याचबरोबर आयसीसीवरही दबाव टाकला व ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धाही रद्द करायला लावली. यामागे गांगुलीचा मुत्सद्दीपणाच सिद्ध झाला. आता यामुळे मंडळाचा 4 हजार कोटींचा तोटा होणार होता तेदेखील टाळला असून आता 51 दिवसांच्या वेळापत्रकात ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून अमिरातीत रंगणार आहे.
मार्चमध्ये ही स्पर्धा सुरू होणार होती. मात्र, त्यावेळी करोनाचा धोका वाढल्याने स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, गांगुलीने सर्व सदस्यांना विश्वासात घेत स्पर्धा रद्द न करता केवळ अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केली व आपली दूरदृष्टी सिद्ध केली. मंडळाचा स्टार इंडियाशी असलेला 3 हजार 300 कोटींचा करार कायम राहिला.
स्टारने यातील 2 हजार कोटी आधीच मंडळाला दिले होते. त्यामुळे जर ही स्पर्धा रद्द झाली असती तर मंडळाला यातील काही रक्कम परत करावी लागली असती तसेच करारातील उर्वरित 1300 कोटींदेखील बुडाले असते. त्याचबरोबर चीनच्या व्हिवो कंपनीशी असलेल्या करारातून 440 कोटी मंडळाला मिळतात त्यावर देखील पाणी सोडावे लागले असते. लडाखमधील तणाव व करोनाचा प्रसार यांमुळे देशात चीनबाबत असंतोष पसरलेला असतानाही हा करार यंदा रद्द करणे शक्य नसून पुढील वर्षी करार संपुष्टात आणण्यात येईल असे सांगत गांगुलीने केंद्र सरकारलाही आपल्या बाजूने करण्यात यश मिळवले.
तसेच स्पर्धेचे सह प्रायोजक असलेल्या ड्रीम इलेव्हन, पे-टीएम व सीईटी यांच्याकडून मिळणारे 170 कोटी रुपयेदेखील मिळण्याचा मार्ग मोकळा केला. या स्पर्धेचे आयोजन अमिरातीत करण्यात येणार असल्याने त्यांच्या क्रिकेट संघटनेलाही बीसीसीआयकडून करोडो रुपये मिळणार आहेत. तसेच देशांतर्गत स्पर्धांचा खर्च, निवृत्त क्रिकेटपटूंना देण्यात येणारे निवृत्तिवेतन देखील आता बीसीसीआय सहज देऊ शकते. त्यामुळे गांगुली यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर कधीकाळी भारतीय संघाचा जगात दबदबा निर्माण केला होता तसाच आता बीसीसीआयचे जागतिक क्रिकेटवरील वर्चस्वही सिद्ध केले.