नवी दिल्ली – करोना महामारीत आयपीएल स्पर्धा पार पडणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, बीसीसीआयने हे आव्हान स्वीकारत युएईत स्पर्धेचे आयोजन करून ते यशस्वीपणे पार पडले. यावेळी बीसीसीआयच्या मदतीला आलेल्या युएई बोर्डाला मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने आयपीएल-2020चे आयोजन करणाऱ्या ईसीबीला सुमारे 100 कोटी रुपये (14 लाख अमेरिकन डॉलर) दिले. दुबई, शाहजाह व अबु धाबी येथे स्पर्धेचे सामने पार पडले. हीच लीग भारतात पार पडली असता बीसीसीआयला सलंग्न संघटनांना 60 सामन्यांसाठी केवळ 60 कोटीच द्यावे लागले असते. त्या तुलनेत ईसीबीला अधिक रक्कम मोजावी लागली.
बीसीसीआयच्या नियमानुसार एका सामन्यासाठी 1 कोटी असे राज्य संघटनांना दिले जातात. बीसीसीआयने यंदा ही रक्कम 30 ते 50 लाख रुपयांनी वाढविली. बीसीसीआयकडून 100 कोटी हे फक्त ईसीबीला मिळाले. या व्यतिरिक्त युएईच्या 14 फाईव्ह स्टार हॉटेल्सना झालेल्या कमाईचा आकडा वेगळाच आहे.
नवीन हंगामाची तयारी सुरु
तेरावा हंगाम संपल्यानंतर बीसीसीआयने लगेचच पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. 2021मध्ये एप्रिल-मे महिन्यात भारतातच स्पर्धेचे आयोजन करण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न असल्याचे अध्यक्ष सौरव गांगुली याने स्पष्ट केले आहे. इतकच नव्हे तर पुढील हंगामासाठी नववा संघ मैदानात उतरवण्याचीही बीसीसीआयची तयारी आहे. याबाबत अद्याप बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, अदानी ग्रुप आणि संजीव गोएंका ग्रुप नवव्या संघासाठी बोली लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या मोसमाचे आयोजन 29 मार्च 2020मध्ये केले होते. परंतु करोना संसर्गामुळे या स्पर्धा दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्या. त्यातच ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द करण्यात आल्याने बीसीसीआयला ऑक्टोबर-नोव्हेंबरची विंडो आयपीएल आयोजनाची संधी मिळाली. परंतु देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच होती.
यावर बीसीसीआयने युएईचा पर्याय शोधला. यानंतर युएई सरकार आणि क्रिकेट मंडळाने मिळून आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यात बीसीसीआयला सहकार्य केले. पण स्पर्धा रद्द केल्यास बीसीसीआयला सुमारे 4 हजार कोटींचा फटका बसला असता.