मुंबई – आयपीएल स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ मानल्या जात असलेल्या मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांना बीसीसीआयने नोटीस पाठवली आहे व त्यांना याबाबत लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे.
आयपीएलमधील हे एक प्रकरण असून, या प्रकरणी अंबानी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. बीसीसीआयचे नीतिमत्ता अधिकारी विनीत सरन यांनी ही माहिती दिली आहे. नीता अंबानी यांना 2 सप्टेंबरपर्यंत त्यांच्यावरील हितसंबंधांच्या विरोधातील आरोपांवर लेखी उत्तर देण्यास सांगितले गेले आहे. नीता अंबानी यांच्याबाबतची तक्रार ही माजी एमपीसीए सदस्य संजीव गुप्ता यांनी केली होती. त्यानंतर अंबानी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
संजीव गुप्ता यांनी आरोप केला की, मुंबई इंडियन्सच्या मालकांनी आयपीएलमध्ये परस्पर हितसंबंध जपल्याचे समोर आले आहे. कारण नीता अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येदेखील संचालक आहेत, या कंपनीने अलीकडेच वायकॉम 18 तर्फे 23 हजार 758 कोटी रुपयांना आयपीएलचे डिजिटल अधिकार विकत घेतले आहेत. त्यामुळे त्यांनी परस्पर हितसंबंध जपल्याचे समोर येत आहे. कारण वायकॉम 18 ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. त्यामुळे एकाच वेळी एका कंपनीतील व्यक्ती संघही विकत घेते आणि स्पर्धेचे हक्कही विकत घेते, हे कसे होऊ शकते. त्यामुळेच नीता अंबानी यांनी परस्पर हितसंबंध जपलेले आहेत आणि त्यामुळेच मी त्यांची तक्रार केलेली आहे.
उत्तराकडे लक्ष राहणार
यापूर्वी नीता अंबानी किंवा रिलायन्स यांच्या नावावर फक्त मुंबई इंडियन्स हा संघच होता. पण यावर्षी रिलायन्सच्या उपकंपनीने आयपीएलचे डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे हा वाद आता समोर आला आहे. त्यामुळे नीता अंबानी या या नोटिशीला काय उत्तर पाठवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.