आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचा सल्ला
मुंबई – क्रिकेटचे सट्टे लावणारा तसेच एक बूकी म्हणून अनेक सामन्यांत फिक्सिंग केल्याचे आरोप असलेल्या अनील जयसिंघानी याला गुजरात पोलीसांनी नुकतीच अटक केली. मात्र, त्याचाच धसका घेत बीसीसीआयने आता आयपीएल स्पर्धेत खेळत असलेल्या सगळ्या क्रिकेटपटूंना सावध राहण्याची सूचना केली आहे. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद तसेच संदेशाद्वारे संपर्क न करण्याचेही आदेश दिले आहेत.
जयसिंघानी याने यापूर्वीही केवळ आयपीएलच नव्हे तर अनेक स्पर्धांमध्ये सट्टेबाजी केल्याचे समोर आले होते. आता त्याला जरी अटक केली गेली असली तरीही त्याचे सहकारी अद्याप बाहेरच असल्याने व आयपीएल स्पर्धा तोंडावर आलेली असल्याने बीसीसीआयने सावधगिरीचा उपाय केला आहे.
जयसिंघानीला अटक करण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलीस यंत्रणेने फिल्डिंग लावली होती. मात्र, तो काही जाळ्यात अडकत नव्हता. आता त्याला अटक झाल्यावर बीसीसीआयने त्यांना संपर्क करत असलेल्या सगळ्याच व्यक्तींची माहिती मागितली असून कोणत्याही अनोळखी व्यक्तीने संपर्क केल्यास त्याची माहिती लगेचच बीसीसीआयला कळवण्याचे आदेश दिले आहेत.
जयसिंघानीचे नाव खूप मोठ्या कालावधीनंतर समोर आले ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी केलेल्या तक्रारीनंतर. तेव्हा या बुकीला गुजरातमधील वडोदरा येथून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. अनिल सात वर्षांपासून फरार होता. तो आयपीएल सामन्यांवर सट्टा लावायचा.