सुखद वातावरणामुळे भाटघर परिसरात पक्ष्यांची किलबिल वाढली
भाटघर – भोर तालुक्यात झालेल्या दमदार पावसाने सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत भाटघर परिसरात अनुकूल वातावरण झाल्याने निसर्गातील पशुपक्षी सुखावले आहेत. मोबाइल टॉवरमुळे व हवामानात होत असलेल्या बदलांमुळे याचा दुष्परिणाम पक्ष्यांच्या संख्येत घट होण्यावर होत आहे. अशातही या परिसरात सुगरण पक्ष्यांची जागोजागच्या झाडांवर बांधलेली घरटी मनाला सुखावत आहेत.
भाटघर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र निसर्गाचे हिरवेगार गालीचे पांघरल्याचे चित्र आहे. सुगरण पक्ष्यांनी वेगवेगळ्या झाडांच्या फांद्यावर गवताच्या पात्यांची अतिशय सुबक विणकाम करीत घरटी बांधली आहेत.
या घरट्यात जाण्याचा मार्ग हा जमिनीकडून आकाशाच्या बाजूला जाणारा आहे.
खोप्यामध्ये बसण्यासाठी मऊ लुसलुसीत गवतांनी माचून गादीप्रमाणे रचना केलेली असते. कितीही जोरदार पाऊस झाला अथवा सोसाट्याचा वारा आला तरी त्याचा घरट्याच्या आतील बाजूस कोणताही परिणाम होत नाही. सध्या, डोंगरदऱ्यांतील झाडांवर अशी घरटी जागोजागी दिसत आहेत.