बावडा -येथे असलेला पाझर तलाव गेल्या अनेक महिन्यांपासून कोरडा ठाक पडला आहे. अशातच पाऊस तर येतोय पण समाधानकारक नाही. त्यामुळे या परिसरातील भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. पर्यायाने कूपनलिका, विहिरींचेही पाणी संपुष्टात आल्याने या भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
बावडा गावाला कोणत्याही परिस्थितीत भविष्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येऊ नये. यासाठी 1972मध्ये गावाच्या पश्चिमेला मोठ्या साठवण क्षमतेच्या पाझर तलावाची निर्मिती केली. या तलावामुळे गेली कित्येक वर्षे या परिसरातील कूपनलिका, हातपंप व विहिरींना सतत चांगला पाणीपुरवठा होण्यास मदत होत होती. त्यामुळे या भागात कधी फारशी पाणीटंचाई जाणवतच नव्हती.
अशातच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंधारण योजनेतून व नीरा-भीमा कारखान्याच्या सहकार्याने या तलावातील गाळ काढून काही प्रमाणात खोली वाढवली होती. गेल्या तीन-चार वर्षांपासून या परिसरात पावसाचे प्रमाण चांगलेच घटल्याने त्याचा परिणाम या तलावावरती झाला आहे.
पर्यायाने या परिसरातील भूजल पातळीतही कमालीची घट झाली आहे. कधीच रिकामा न राहणारा पाझर तलाव तीन वर्षांपासून सतत कोरडाच राहू लागला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्याने तलाव 100 टक्के भरला होता, मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही.
पिके जळून जाण्याच्या मार्गावर
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातही बदल झाला आणि ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला. त्यामुळे पुन्हा पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी शेतात जनावरांसाठी कडवळ, मका आदी पिकांची लागवड केली खरी पण पाण्याअभावी काही जळून गेली तर काही जळून जाण्याच्या मार्गावर आहे.