रेडा (प्रतिनिधी) – बावडा ते भांडगाव रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीचा होता,तो राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून करण्यात आला.मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे पुन्हा अडचणीचा झाला आहे.रस्त्यावर जागोजागी खड्डे तर आहेतच,शिवाय ओढ्यावरील पुल बांधकाम विभागाच्या चुकीमुळे पूर्णपणे वाहून गेला आहे.त्यामुळे भांडगाव करांची अडचण पुन्हा झाली आहे.यामध्ये अनेक लहान मोठ्या गाड्या घुसून प्रवासी जखमी होत आहेत.लवकर दुरुस्ती करण्यात यावी.अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यातील मानाचे व जागृत असलेले देवस्थान श्री म्हसोबा कडे जाणारा बावडा ते भांडगाव रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत होता.तो दोन वर्षापुर्वी तालुक्याचे लोकप्रिनिधी व सार्वजनिक बांधकाम,पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून या रस्त्याचे भाग्य उजळले आणि रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले.
परंतु रस्त्याचे काम चालू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधितांनी ठेकेदारावर पाहिजे ते लक्ष ठेवले नाही त्यामुळे रस्त्याचा दर्जा खालावला गेला. या रस्त्याचे हवे तसे काम दर्जेदार झालेच नाही. तसेच या रस्त्यावरील जुना पुल काढून नवीन पुल बंधने गरजेचे असताना, व या भागातील ग्रामस्थांची मागणी असताना देखील जुन्याच पुलाला डागडुजी केली आणि त्यावर डांबरीकरण केले. त्याचाच परिणाम भगदाड पडण्यासाठी झालेला दिसतो आहे.
काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलाचा एक दगडही जागेवर राहिला नाही.त्यामुळे भांडगाव करांना पुन्हा बावडा गावाकडे येताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.वास्तविक पाहता भांडगाव करांना बावडा मार्गे अकलूज, बारामती व अन्य ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता आहे.
तसेच याठिकाणी असलेले प्रसिद्ध देवस्थान श्री म्हसोबाच्या दर्शनाला राज्यातील अनेक भाविक याच रस्त्याने येतात,परंतु रस्ता खराब झाल्यामुळे भाविकांची देखील कुचंबणा होत आहे.त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांनी केली आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर चे उपविभागीय अभियंता धनंजय वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,सदर पूल अद्ययावत करण्यासाठी बजेटच्या कामांमध्ये प्रस्ताव सादर केला आहे.वाहतुकीसाठी योग्य पूल या ठिकाणी निर्माण करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभागाचा असून,कोणतेही नागरिकांना आगामी काळात त्रास होणार नाही.याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभाग घेईल व तात्काळ या पुलाची दुरुस्ती करण्यात येईल.अशी माहिती उपविभागीय अभियंता धनंजय वैद्य यांनी दिली.
इंदापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे रस्ते व निर्माण केलेले छोटे पूल नादुरुस्त झाले आहेत. तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल दोन वेळा या पुलाची दुरुस्ती केलेली आहे.या रस्त्याने वर्दळ असते त्यामुळे अद्यावत पुल सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेनुसार उभारण्यासाठी बजेटमध्ये प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखल केला आहे.अशीही माहिती अभियंता धनंजय वैद्य यांनी दिली.